तात्काळ ओला दुष्काळ जाहिर करावा… चोपडा आम आदमी पार्टी तर्फे तहसिलदार यांना निवेदन…
महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी :-
परतीच्या पावसाने शेतकऱ्याचा तोंडी आलेला घास हिरावून घेतला आहे. त्यात सोयाबीन, कापूस , मूग, उडीद यांसह सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात विमा कंपनी शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. शेतकरी मोठया आर्थिक संकटात सापडला असून शासनाने हेक्टरी ५० हजार रुपये त्वरीत द्यावेत अशा आशयाचे निवेदन आम आदमी पक्षाचा वतीने तहसिलदार यांना देण्यात आले.

यंदा खरिपाच्या हंगामात बेभरवशाच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यत्वे, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ विभागात सोयाबीन पिकास सर्वात जास्त फटका बसला आहे. पश्चिम महाराष्ट्रात कापुस, भाजीपाला व फळबागांना झळ बसली आहे. दिवाळीच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची अपेक्षा होती. परंतु सरकारच्या वेळकाढू धोरणामुळे आणि विमा संदर्भातील दिरंगाई मुळे नाईलाजाने शेतकऱ्यानी दिवाळी कशीबशी साजरी केली. खोक्यामध्ये अडकलेले सरकार शेतकऱ्यांबाबत असंवेदनशिल आहेच. या काळात हे अधोरेखीत झाले आहे. पुर्वी सरकारी अधिकारी पंचनामा करीत. आता मोबाईलवर फोटो काढून पाठवा असे विमा कंपनी – कळविते. शेतकऱ्यांना यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी येतात.

सध्या विमा अधिकारी पाहणी करीत आहे, परंतु काढून झालेल्या सोयाबीनच्या शेताची पाहणी करून निष्कर्ष कसा काढणार ? शिवाय काही ठिकाणी विमा अधिकारी पैसे मागतात. अशा तक्रारी येत आहेत. विमा भरपाई मिळविणे हे अधिकच किचकट झाले आहे. सरकारने ओला दुष्काळ जाहिर केला तर रब्बी पेरणीसाठी काही पैसे हाताशी येऊ शकतात. दुष्काळ सदृश्य परिस्थीती म्हटल्याने शेतकऱ्यांना काहीच दिलासा मिळत नाही. आप सरकार दिल्लीत देते त्याप्रमाणे सरकारने हेक्टरी पन्नास हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आम आदमी पक्ष करीत आहे. याबाबत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा असे आवाहन आम आदमी पार्टीच्या चोपडा शहर व तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.

सदर निवेदन देते वेळी विठलराव साळुंखे ( जिल्हा उपसंयोजक ) , आर डी पाटील ( तालुका संयोजक ) , सुधीर पाटील ( शहर संयोजक ) , समाधान बाविस्कर ( तालुका उपसंयोजक ) , रामचंद्र भालेराव ( शहर सचिव ) , रतनसिंग बारेला , रतीलाल सोनवणे , शैलेंद्र पवार , विश्राम तेले आदी उपस्थित होते….
