चोपडा नगरपरिषद निराधार, बेघर गरीबांची एक वेळ जेवणाची सोय करणार, नगराध्यक्षा सौ. मनिषा जीवन चौधरी

चोपडा (प्रतिनिधी):- देशात कोराना विषाणू (कोव्हीड 19) चा या रोगाचा प्रार्दुभाव वाढला आहे. त्याचा प्रसार व प्रार्दुभाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात संचारबंदी व जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच नगरपरिषदेकडूनही कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी शहरात विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत.
संपूर्ण चोपडा नगरपरिषदेतर्फे जंतुनाशक फवारणी व फॉगिंग केली जात आहे. तसेच सदर जमाव बंदी व संचारबंदी च्या काळात जीवनाश्यक बाबींचा पुरवठा म्हणून भाजीपाला विक्री सुरु ठेवणे अगत्याचे आहे. परंतु नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी भाजीपाला बाजार व भाजीपाला विक्री विकेंद्रीत करुन २४ ठिकाणी भाजीपाला विक्रीसाठी निश्चित करण्यात आलेली आहेत. सदर ठिकाणीच भाजीपाला विक्री करणेकामी विक्रेत्यांना परवाना ओळखपत्र देऊन दैनंदिन पासेस दिले जात आहेत.
सदर काळात नागरिकांनी कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखणेकामी नागरिकांनी घरी रहावे तसेच स्वतःची स्वच्छता विषयक योग्य ती काळजी घ्यावी, Social Distance पाळावे याबाबत नगरपरिषदेतर्फे बॅनर्स, पोस्टर्स, स्टिकर्स, भित्तीचित्रे, जाहिर दवंडी, जाहीर सूचना इ. द्वारे जनजागृती करण्यात येत आहे. तसेच शहरात बाहेरुन आलेल्या नागरीकांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलेले असून त्यांना Home Quarantine करण्यात आलेले आहे. तसेच शहरात जमावबंदी व नागरीकांची गर्दी होऊ नये म्हणून नगरपरिषदेमार्फत सकाळी ८.०० ते रात्री ८.०० या कालावधीकरीता गस्ती पथक कार्यान्वित करण्यात आलेले आहे. सदर संचार बंदी काळात शहरातील निराश्रित, निराधार, बेघर कुटूंबिय व शहरी गरीबांची जेवणाची गैरसोय होत आहे. सदर बाब विचारात घेता अशा बेघर, निराश्रित , गरीब लोकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन नगरपरिषदेमार्फत त्यांची किमान एक वेळची जेवणाची सोय व्हावी यासाठी जेवणाची पाकीटे देण्यात येणार आहेत. अशी माहिती नगराध्यक्षा, सौ. मनिषा जीवन चौधरी व मुख्याधिकारी, अविनाश गांगोडे यांनी दिली.