वाळू उपसा विरोधात ग्रामसभा एकवटली;#चोपडा तालुक्यातील वढोदा येथील वाळू लिलावास ग्रामसभेत विरोध..
महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी
चोपडा – तालुक्यातील वढोदा येथील तापी नदी पात्रातील वाळू उपसा झाला तर परिसरातील जलस्त्रोतांची पाण्याची पातळी कमी होईल. सद्यस्थितीत कूपनलिकांना १६० फुटांवर पाणी आहे. उन्हाळ्यात ही परिस्थिती आणखी बिकट होईल. वाळू वाहतूकीसाठी गावातील रस्त्यांचा वापर होत असल्याने अपघात होण्याची व रस्त्यांची दुरवस्था होण्याची शक्यता आहे. या कारणांसाठी सारे ग्रामस्थ एकवटले आणि वढोदा येथील तापी नदी पात्रातील वाळू लिलावास ग्रामस्थांकडून कडकडुन विरोध करण्याचा निर्णय विशेष ग्रामसभेत घेण्यात आला.


जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये प्रांताधिकारी सीमा अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली वढोदा ग्रामपंचायत कार्यालयामार्फत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेस तहसीलदार अनिल गावीत, मंडळ अधिकारी रवींद्र माळी, सरपंच, पं.स. माजी सभापती गोकुळ पाटील, गावातील आजी माजी पदाधिकारी, मोहिदा येथील तलाठी कोळी, वढोदा येथील तलाठी वंदना कोळी तसेच गावातील सर्व ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने हजर होते. आभार ग्रामसेवक भरत पाटील मानले.

मागील ग्रामसभेत वाळू लिलावास ग्रामस्थांचा विरोध असल्याचा ठराव केला होता. त्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांचा विरोध का आहे, याची कारणे जाऊन घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष आदेशान्वये प्रांताधिकारी यांना ही सभा घेण्यास सांगितले होते. सदर ग्रामसभेत ग्रामस्थांनी नदीपात्रातील वाळू चोरीस जाणार नाही याची काळजी घेतली जाईल असे सांगितले. तालुक्यात अशाच पद्धतीने काही ग्रामपंचायतीने नदीपात्रातील वाळूचा लिलाव करण्यास विरोध केलेला आहे. अशा ग्रामपंचायतींमध्ये प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा होणार आहेत.

**वाळू माफियांना बसेल चाप**
गावकरी ते राव काय करी अशी एक म्हण प्रचलित आहे. गावकऱ्यांच्या या एकजुटीमुळे बेमुर्वतपणे शासकीय अधिकाऱ्यांवर हल्ला करुन तर कधी संगनमत करुन नदीपात्रातून बेसुमार, नियमबाह्य वाळूचा उपसा करणाऱ्या वाळू माफियांना चाप बसणार आहे.