अडावदला नगरपंचायत करण्यासाठी आमदारांनी मुख्यमंत्र्यांना घातले साकडे
महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा (प्रतिनिधी):-
चोपडा तालुक्यातील विकास कामांचा धडाका सतत सुरू ठेवणारे आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तालुक्यातील सर्वात मोठे गाव अडावद येथे नगर पंचायत व्हावी तसेच तालुक्यातील विकास कामांसाठी पत्र दिले.

अडावद हे तालुक्यातील सर्वात मोठे तीस ते चाळीस हजार लोकवस्तीचे गाव आहे. येथील ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेऊन नगरपंचायत व्हावी म्हणून एकमताने ठराव केला. याची तात्काळ दखल घेत माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या विधानसभेच्या अधिवेशनावेळी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची भेट घेऊन अडावद गावाला नगरपंचायत व्हावी यासाठी साकडे घातले. तसेच चोपडा नगर परिषदेच्या मालकीच्या मालमत्तेवर सौर ऊर्जा प्रकल्प विकसित करण्यासाठी निधी मंजूर करावा व चोपडा नगर परिषद हद्दीतील रत्नावती नदी पुनरुज्जीवित व सौंदरीय करण करण्यासाठी निधी मंजूर करावा. या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवली असल्याचे आमदार लताताई सोनवणे यांनी सांगितले.







