भारत श्रमसंस्कृतीचा देश… अर्थतज्ञ दीपक करंजीकर…
महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी :-
भारत हा श्रमसंस्कृतीचा देश असून हळूहळू अनेक तरुणांच्या हाताला काम मिळत आहे. २०३० पर्यंत भारत देशात ३१% लोकांच्या हाताला काम मिळेल व अनेक महत्त्वपूर्ण बदल होतील आणि भारत देश आर्थिक सुबत्तेत अव्वल स्थानी राहील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला ते
स्व. नानासाहेब यशवंत गोविंद हरताळकर यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विश्वपटलावरील भारत या विषयावर बोलत होते.

सातपुडा आणि तापी , पाणी आणि शेती असा वैशिष्ट्यपुर्ण चोपडा तालुका असल्याचे ते म्हणाले.
कुठलाही इतिहास हा सापेक्ष असतो. इंग्रजांनी भारताचे अक्षरशः लचके तोडले. फाळणीत दीड कोटी लोकांची वाताहात झाली, विस्थापित झाले. त्याकाळी नेहरू ४० कोटी गरीब जनतेचे पंतप्रधान होते. धर्मीय फाळणी जगात कुठेच झाली नसून इंग्रजांनी भारतात केली.
जगात लोकशाही असलेला भारत हा एकमेव देश आहे. स्वातंत्र्याचा खरा अर्थ फक्त भारतातच अनुभवास मिळतो. परराष्ट्र धोरणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

समाजवाद आपण नेहरूंच्या काळात स्विकारला पण आज त्याचा लवलेशही जाणवत नाही.अमेरिका ग्लोबायझेशनच्या नावाने लूट करत असल्याचे म्हणाले. भारत श्रमसंस्कृतीचा देश आहे.आज मोजक्या लोकांच्या हाताला काम आहे. देश चालविणे सोपे नाही.
जगाच्या इतिहासात अनेक मोठ्या घटना घडल्या आहेत. त्या घटनांचा परिणाम जगातील अर्थकारणावर होत असतो. देशाचा विकास दर (जीडीपी) म्हणजे आकड्यांचाच खेळ आहे. जगातील प्रत्येक देशातील समाज जसा असेल तसाच आकड्यांचा खेळ केला जातो. आजही जगातील अनेक देशांकडे कुत्सित नजरेने पाहीले जाते, खरेतर हिच सर्वात मोठी अफरातफर आहे. त्याची पाळेमुळे अमेरिकेत रुजलेली आहेत. जागतिक बँकेवर असलेले त्यांचे नियंत्रण हे सर्वांसाठीच धोक्याचे आहे, असेही ते म्हणाले.

पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धातील घटनांचा संदर्भ देताना हे युद्ध म्हणजे केवळ व्यवसायाचे नियोजन होते, असे करंजीकर म्हणाले. पहिल्या महायुद्धात अमेरिका कुठेही नव्हती. त्यानंतर १९३० ला तेथे जागतिक महामंदी आली. लोकांच्या रोजच्या जेवणाच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. युद्धाशी काहीही संबंध नसलेल्या जपानने दुसऱ्या महायुद्धात अमरिकेवर हल्ला केला. या सगळ्या घटनांचा संदर्भ हा केवळ अर्थकारणाशी असून युद्ध म्हणजे व्यापार आहे, असेही ते म्हणाले.

सगळ्यात जास्त वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था भारताची आहे. सध्या भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आहे. सध्या जीडीपी ६.९ असल्याचे ते म्हणाले.गरज आणि खरेदी करण्याची शक्ती यातूनच मागणी वाढत असते. बँक खाते उघडणे आवश्यक झाले आहे.२०३० पर्यन्त ३१% लोकांच्या हाताला काम मिळेल. भारतीय माणसाला संधी मिळाली की तो सोने करतो. उद्योगात फार मोठा बदल होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. येत्या पाच वर्षात बँक नावाची गोष्ट अस्तिवात राहणार नाही. जूगाड ही स्वामित्व हक्क धन आहे. तरुणाईने उदासीनता सोडली पाहिजे. आर्थिक ताकद माणसात मिंधेपणा आणते

असे विविध प्रकारचे पैलू त्यांनी उपस्थितांसमोर मांडले.
कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर विवेकानंद विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉ विकास हरताळकर , सुधाकर केंगे सर , श्रीकांत जोशी होते. कार्यक्रमांचे प्रास्ताविक डॉ अमित हरताळकर यांनी केले तर सूत्रसंचलन राधेश्याम पाटील यांनी केले..