गिरीश महाजन , गुलाबराव पाटील यांची एकेक मतासाठी दारोदारी भटकंती…..एकनाथराव खडसे…
महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी :-
जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून दोन्ही पॅनल विजयाचा आशावाद व्यक्त करीत आहेत. आज चोपडा येथील गिरीराज लॉन्स येथे सहकार पॅनल तर्फे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी एकनाथराव खडसे आपल्या मनोगतात म्हणाले की, दूध संघाच्या निवडणुकीत २ मंत्री , ५ आमदार आपल्या विजयासाठी दारोदारी भटकत आहेत.मतदारांकडे पॅनलसाठी मते न मागता वैयक्तिक एक मत मिळावे यासाठी मतदारांना साकडे घालत आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे प्रलोभने देत आहेत आणि यातूनच त्यांच्या पराभव निश्चित दिसून येत आहे अशा प्रकारच्या खोचक टोला एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन व गुलाबराव पाटील यांना लगावला.

२ मंत्री , ५ आमदार सर्व कामे सोडून घरोघरी , गल्लोगल्ली एकेक मतासाठी भटकत आहेत.त्यांना लोकांच्या प्रश्नांचे घेणे देणे नाही. कॅबिनेटची कामे वाऱ्यावर सोडली आहेत.
भाजपवाल्यांना सत्तेच्या माज आहे. त्यांची मस्ती जिरवण्याची हीच वेळ असल्याचे ते म्हणाले .१० तारखेपर्यंत सगळ्या मतदारांनी प्रामाणिकपणे टिकून राहा ,पक्के रहा आणि विमान चिन्हावर शिक्का मारा असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. निवडणुकीचा विजय ऐतिहासिक राहिला पाहिजे आणि खडसेंचे पॅनल पाडण्यासाठी त्यांनी जे काही प्रयत्न केले आहेत ते सर्व प्रयत्न फेल ठरले पाहिजेत असा ऐतिहासिक विजय मतदारांनी घडवावा असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.

संचालक मंडळास बदनाम करण्याचे षडयंत्र गिरीश महाजन व मंगेश चव्हाण यांनी केले आहे. आम्ही सचोटीने, प्रामाणिकपणे व्यवहार केलेला आहे. सर्व दूध उत्पादकांना माहित आहे. दूध संघ आणि महाफेड एकाच वेळी स्थापन झाले होते पण महाफेड आज अस्तित्वात नाही तसेच जर दूध संघात प्रामाणिकपणे काम केले नसते तर आज दूध संघ सुद्धा महाफेड सारखा बंद झाला असता. यांच्या नजरा या दूध संघाच्या जमिनीकडे असल्याचे खडसे म्हणाले .मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या जमिनीवर कोणाची नजर होती ? यांची नजर दूध संघाच्या जमिनीवर असल्याचे ते म्हणाले.

नाथाभाऊ शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतीत राबला आहे . मला दूध काढणे जमते .गुलाबराव पाटील , गिरीश महाजन यांनी दूध काढून दाखवावे असे आव्हान देखील त्यांनी यावेळी केले .
१९७७ – ७८ साली आणीबाणीच्या काळात कोथडी दूध उत्पादक संघाचा चेअरमन असल्याचे देखील त्यांनी नमूद केले . महाजन यांनी भ्रष्टाचार काढून दाखवावा असे आव्हान देखील त्यांनी यावेळी केले. एका महिलेशी लढताना त्यांना गल्लोगल्ली फिरावे लागत आहे. एकेक मतासाठी मतदारांना साकडे घालावे लागत आहे आणि शेवटी त्यांना पराभवाची नामुष्की स्वीकारावी लागणार आहे असा देखील पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. गिरीश महाजन ३० वर्षापासून आमदार आहेत पण एकदाही दूध संघात आले नाहीत तसेच गुलाबराव पाटील देखील आतापर्यंत दूध संघात आले नाहीत त्यांना दूध संघच माहीत नाही फक्त दूध संघाच्या जमिनीवर त्यांच्या डोळा असल्याचे खडसें म्हणाले.

माझ्या एकुलता एक मुलगा वारला. त्याबद्दल गिरीश महाजन यांनी अतिशय खालच्या पातळीचे, नीच व हीन प्रवृत्तीचे वक्तव्य केले त्याला एक कारण म्हणजे त्यांच्या पराभव त्यांच्या डोळ्यासमोर दिसत असल्यामुळे त्यांचे संतुलन सगळ्या बाबतीत ढासळले आहे असे देखील खडसे म्हणाले…