तावसे बु!! येथील शेत रस्ता गेला चोरीला…
शेतकरी व ग्रामस्थांत तीव्र नाराजी…
माहितीच्या अधिकारात बाब उघड…
चोपडा प्रतिनिधी :—
सन २०१४ – १५ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा २००५ अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत तब्बल १५ लाख रुपये खर्च करून तालुक्यांतील तावसे बु !! येथील शेतकरी रविंद्र मुलचंद पाटील यांच्या शेता पासून ते अशोक रामचंद्र जाधव यांच्या शेता पर्यंतचा शेत रस्ता कागदोपत्री झाल्याचे आढळून आले आहे पण मात्र प्रत्यक्षात सदर शेत रस्ता झालाच नसल्याचा धक्कादायक प्रकार माहितीच्या अधिकारात उघड झाला आहे.


सदर रस्ता प्रत्यक्षात झालाच नाही म्हणून सदर रस्ता व कामाची चौकशी व्हावी यासाठी संदीप अमृत बाविस्कर यांनी २१/ १२/ २०१८ रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. तसेच २७ जुलै रोजी रमेश भिला कोळी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जि प जळगाव व जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे रस्त्याची चौकशीसाठी तक्रार अर्ज दाखल केला आहे.तर २८ जून रोजी पत्रकार राजेंद्र पाटील यांनी देखील माहितीचा अधिकार टाकला होता.

सदर रस्ता प्रत्यक्षात झालाच नाही.तर तत्कालीन सरपंच , ग्रामसेवक , ग्रामरोजगार सेवक व अधिकारी यांनी संगनमत करून सदर रस्त्याचे व नालावरील पुलाचे प्रत्यक्ष काम न करता फक्त कागदावरच केलेले दिसून येत आहे. सदरील रस्त्याच्या कामात शासनाची फसवणूक करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करून शासनाचा पैशांचा अपहार झालेला आहे. तरी संबंधितांची चौकशी होऊन गुन्हेगारांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
सदर रस्ता व कामाची चौकशी न केल्यास गटविकास अधिकारी कार्यालायासमोर आमरण उपोषणाचा इशारा तक्रारदार यांनी दिला आहे..
