दिल्लीचे तख्त काबीज करण्यासाठी उद्धव ठाकरें च्या पाठीशी महाराष्ट्राने उभे राहिले पाहिजे ; खा.
संजय राऊत

चोपडा ( प्रतिनिधी )—–
राज्यात गेल्या दीड वर्षांपासून महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून संकटांची मालिका सुरू आहे.त्यात कोरोना महामारीचे मोठे आव्हान होते.अशा गंभीर संकटात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे संयमाने तोंड देत आहेत.
सरकारच्या अथक प्रयत्नाने महाराष्ट्रात कोरोना संसर्ग आटोक्यात आला.देशात इतर राज्यांच्या तुलनेत राज्य सरकारचे काम उत्तम पद्धतीने सुरू आहे.असे सुप्रीम कोर्टाने देखील म्हटले आहे.
त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाची देशात सर्वत्र चर्चा सुरू असून,देशाला त्यांच्या सारख्या तरुण
आणि सयंमी नेतृत्वाची गरज आहे.परंतू दिल्लीचे
तख्त काबीज करण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या पाठीशी अख्ख्या महाराष्ट्राने खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.म्हणजे अठ्ठेचाळीस पैकी किमान
चाळीस खासदार निवडून आले पाहिजे.त्यासाठी
शिवसैनिकांनी कामाल लागले पाहिजे असा ठाम
विश्वास शिवसेना नेते तथा खा.संजय राऊत यांनी
व्यक्त केला.
रावेर लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर

असतांना चोपडा येथील शिवसेनेच्या मेळाव्यात
मेळाव्यात खा.संजय राऊत बोलत होते.मराठा
आरक्षण,ओबीसी आरक्षण,कांजूर येथील मेट्रो कारशेडचा प्रश्न व पीक विमा योजना या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची नुकतीच भेट घेतली.त्यावर राज्यातील भाजप नेत्यांच्या पोटात दुखायला लागले.आघाडी सरकारचे काम चांगले सुरू आहे.विरोधकांकडे बोलयला कोणताच मुद्दा नाही.तीन पक्षांचे सरकार केंव्हाही पडेल अशी
स्वप्न विरोधक बघत आहेत परंतू आमचे सरकार
पाच वर्षे टिकेल यात शंका नाही.वाघ तो वाघ
असतो ! तो पिंजऱ्यातला असो का जंगलातला !
त्याच्याशी दोस्ती करायला हिंमत लागते असा टोला खा.संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष
चंद्रकांत पाटील यांना लगावला.नगरपालिका,
पंचायत समिती व जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा
भगवा फडकला पाहिजे त्यासाठी नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी कामाला लागा.ज्यांनी पाठीत खंजीर खुपसला त्यांचा समाचार आम्ही घेऊ त्यात जामनेर देखील आहे.काळजी करू नका
त्यासाठी मी जामनेरला येईन.असे खा.संजय राऊत म्हणाले.
यावेळी ना.गुलाबराव पाटील म्हणाले की,

खान्देश मध्ये चक्री वादळाने दीड हजार हेक्टर
क्षेत्रावरील केळीचे नुकसान झाले आहे.कोकण
प्रमाणे तौक्ते वादळाच्या धर्तीवर शेतकऱ्यांना मदत मिळायला पाहिजे.जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाडून आम्ही शिवसेनेचे आमदार
निवडून आलो आहोत.आता काँग्रेस,राष्ट्रवादी व
शिवसेना अशा तीन पक्षाचे महाविकास सरकार
आहे.तसेच आगामी नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत काय भूमिका घ्यायची ! याचा निर्णय लवकर घेऊन तसे आदेश द्या ! आज रावेर मतदार संघात चांगले वातावरण असल्याने एक आमदार अजून निवडून येऊ शकतो.रावेर लोकसभा क्षेत्रात पाच विधानसभा क्षेत्र येतात त्यापैकी दोन भाजपा,एक काँग्रेस व दोन शिवसेने कडे आहेत

पंधरा जिल्हा परिषदां पैकी दोन जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचे आहेत तसेच चार नगरपालिका व चार पंचायत समिती सेनेच्या ताब्यात आहेत.लोकप्रतिनिधी असल्याशिवाय कुठल्याही संघटनेचे बळ वाढू शकत नाही.चोपडा तालुक्यात पहिल्यापासून संघटना मजबूत होती आजही आहे तसेच यापुढेही राहणार आहे पण मुक्ताईनगर मध्ये ज्याने आम्हाला कायम सतवलं त्याच्या छातीवर आम्ही भगवा झेंडा फडकविला . याबद्दल मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.कोकणा नंतर उत्तर महाराष्ट्रातून शिवसेनेचे जास्तीचे आमदार निवडून दिले आहेत.असे ना.पाटील यांनी सांगितले.यावेळी माजी आमदार प्रा.चंद्रकांत
सोनवणे म्हणाले पाडळसे धरणाला तातडीने निधी उपलब्ध करून दिला तर चोपड्यासह पाच तालुक्यांचा कायापालट होणार आहे.तसेच घुऱ्या
घाटी येथील एक्स्प्रेस कॅनॉलच्या कामाला गती
मिळाली पाहिजे.त्यासाठी दोन्ही प्रकल्पांचा बळीराजा योजनेत समावेश झाला पाहिजे.खा.
संजय राऊत यांच्या शब्दाला केंद्रात किंमत आहे
म्हणून त्यांनी पाडळसे धरण व एक्स्प्रेस कॅनॉल या दोन्ही प्रकल्पाला चालना देण्यासाठी प्रयत्न
करावा अशी मागणी त्यांनी केली..शहरातील श्रीनाथ
प्राईड येथे सेनेचा मेळावा पार पडला.