तोरण व मरण यामुळेच कोरोना वाढीस लागला आहे..
गोरगावलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांची स्पष्टोक्ती..
चोपडा(प्रतिनिधी) माहे नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी मधील लग्न कार्यांचे तोरण व माणसांचे मरण(प्रेतयात्रा) यात लोकांनी गर्दि केल्यामुळेच कोरोना वाढीस लागला आहे. जानेवारी २०२० मध्ये कोरोना चीनच्या वुहान मध्ये एकाच ठिकाणी होता,परंतु जगात नव्हता. तद्नंतर फेब्रुवारी मध्ये जगात होता, पण देशात नव्हता. मार्च महिन्यात कोरोना देशात होता, पण राज्यात नव्हता. एप्रिलमध्ये राज्यात होता, पण जिल्ह्यात नव्हता. मे महिन्यात कोरोना जिल्ह्यात होता, पण तालुक्यात नव्हता. जून मध्ये तालुक्यात होता, पण गावात नव्हता. जुलै महिन्यात कोरोना गावात होता, पण घरात नव्हता. ऑगस्ट मध्ये कोरोना आपल्या घराच्या दरवाज्याजवळ होता, व तद्नंतर आतापर्यंत कोरोना प्रत्येकाच्या घरात येऊन, राहून, काहींना सोबत घेऊन जाऊन, पुन्हा कायमचा निवास करण्याच्या मार्गावर आहे. यासाठी पुढील काळात कोरोना पासून प्रत्येकाने आपल्या परिवाराला सुरक्षित ठेवून व स्वतःलाही वाचविण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अशी चिंताजनक स्पष्टोक्ती सामाजिक कार्यकर्ते व गोरगावले चे माजी सरपंच जगन्नाथ टि.बाविस्कर यांनी ह्या पत्रकान्वये केली आहे.

राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून त्याला लॉकडाऊन हा पर्याय जरी असला तरी प्रत्येकाने योग्य ती खबरदारी व जबाबदारी घेणे गरजेचे आहे. या पुढील काळात कोरोनाचा उद्रेक वाढता असून कायम राहणारा आहे. आपल्या दिवसभरातील जीवनमानात कोरोना संसर्गात वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते धोक्याच्या पातळ्या सांभाळून प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. त्यात शाळेत जाणे,भाजीपाला खरेदी, गॅस बुकिंग, वर्तमानपत्र वाचणे, दोन खेळाडूंचे खेळ, हॉटेलचे पार्सल यात सर्वात कमी धोका आहे. सांघीक खेळ, चालणे, धावणे, सायकलिंग, किराणा खरेदी, सार्वजनिक वाहनप्रवास, औषधी खरेदी, रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाणे, दवाखान्यातील इतर रुग्णांसोबत बसणे यामुळे थोडा जास्तीचा धोका आहे. तसेच पाहुण्यांना घरी बोलाविणे, पर्यटन करणे, हॉटेल मध्ये किंवा दुसऱ्याच्या घरी जेवायला जाणे,आजारी व्यक्तींना भेटणे, जलतरण करणे, गर्दीच्या कार्यालयात काम करणे, खाजगी शिकवण्या यात त्याहीपेक्षा जास्त धोका संभवतो. प्रेतयात्रा, अंत्यसंस्कारांना उपस्थिती, विमान व रेल्वेचे प्रवास करणे, लग्नकार्यात गर्दी करणे, हस्तांदोलन करणे यात तर अधिकच धोका आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे, मैदानावर खेळणे, सार्वजनिक कार्यक्रम उत्सवात सहभागी होणे, चित्रपटगृहात जाणे, व्यायाम शाळेत जाणे यात सर्वात जास्तीचा धोका असल्यामुळे जनतेने या पुढील काळात घराबाहेर जाऊच नये. गरज पडल्यास बाहेर जातांना मास्क वापरावा, साबण व सॅनिटायझरचा वापर नियमित करावा, हातमोजे वापरावेत, गप्पांचे फड रंगवू नयेत, सुरक्षित अंतर ठेवून कोरोनाचा आजार पसरू नये यासाठी कमी धोका असलेली कामे करावीत.

ह्या काळात शासन प्रशासनासोबत डॉक्टर्स,नर्सेस,पोलीस,पत्रकार,स्वच्छता कर्मचारी,समाजसेवक हेच स्वत:च्या जीवाची व परिवाराची पर्वा न करता आपणांसर्वांसाठी देवदुत म्हणुन कर्तव्य करित आहेत.त्यांनाही आपण समजुन घेऊन सहकार्य केले पाहिजे, असेही आवाहन चोपडा मार्केट कमेटीचे माजी संचालक जगन्नाथ बाविस्कर यांनी केले आहे.
