सध्या कोरोनामुळे सर्वत्र हाहाःकार माजलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात तसेच देशभरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. नांदेडमध्येही कोरोनाचे रुग्ण अलीकडे वाढत आहेत. ही संख्या शंभरीच्या पुढे वाटचाल करत आहे. रुग्णसंख्या वाढत असली तरी या बाबतची प्रचंड भीती मनात बसलेली आहे. नांदेडला एका विशिष्ट समाजामुळे कोरोना मोठ्या प्रमाणात वाढला असा एक प्रचार -अपप्रचार सुरू आहे. तसे पहिले तर प्रत्यक्षात हा रोग दोनशेपेक्षा अधिक देशांमध्ये झपाट्याने पसरलेला आहे. भारतातही जवळपास सर्वच राज्यात या रोगाने पाय पसरलेले आहेत. त्यामुळे या रोगांच्या बाबतीत कोणालाही द्वेषबुद्धीने,द्वेषभावनेने बोलणे ,वागणे किंवा पाहणे हे चुकीचेच ठरेल. हो रोग पृथ्वीवरून जाणार नाही, असे सर्वसामान्य तसेच या क्षेत्रातील वैद्यकीय व जाणकार लोकांचे मत आहे. नांदेडला पवित्र गुरुद्वारा आहे. या गुरुद्वाराच्या माध्यमातून तसेच लंगरसाहिबच्या माध्यमातून दररोज चार ते पाच लाख लोकांची पोटाची भूक भागविली गेली. लंगर साहेब मधून मिळणारी मदत ही गोरगरिबांना ऑक्सिजन प्रमाणे गरजेची वाटत होती, व ती गरजेची पण आहे. तसे पहिले तर आजही गोरगरिबांना अन्नधान्याची मदत व दोन वेळच्या जेवणाची गरज आहे. लंगर साहेबची सेवा सध्या बंद आहे. त्यामुळे गोरगरीब व त्यावर अवलंबून असलेल्या लोकांचे हाल होत आहेत. प्रत्यक्षात आज जेव्हा आपण बाजारात खरेदीसाठी बाहेर पडतो किंवा अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणार्या लोकांना घराबाहेर पडावे लागते अशा परिस्थितीत ज्या लोकांमुळे कोरोना पसरला असा समज आहे, अशी मंडळी जवळपास वावरली तरी लोक त्यांच्यापासून दोन हात दूर जात आहेत. ही परिस्थिती कशामुळे निर्माण झाली यावर विचार करण्याऐवजी माणसाने माणुसकी विसरली नाही पाहिजे हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. दिल्लीतील मरकज व नांदेड मधील गुरुद्वारा या दोन्ही बाबी पाहिल्या तर त्याचा अर्थार्थी संबंध नाही, तरीपण माणूस एकमेकांना पाहत असताना, गाडीवर जात असताना किंवा बाजारात भाजीपाला खरेदी करत असताना सोशल डिस्टन्सिंग पाळत आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळणे चुकीचे नाही, परंतु एखाद्या व्यक्तीबद्दल विशिष्ट द्वेषभावना ठेवणे हे नक्कीच चुकीचे आहे. त्यामुळे कोणाबद्दलही कोणीही द्वेषभावना ठेवू नये प्रत्येकाशी आपुलकीने, प्रेमाने वागावे हे करत असतांना आपल्याला कोरोनाची लढा द्यायचा आहे हे देखील लक्षात ठेवणे गरजेचे वाटते.
नांदेडवर जेव्हा-जेव्हा संकट आले, त्यावेळी शिख बांधवानी केलेली मदत अविस्मरणीय आहे. केवळ नांदेडातच नव्हे तर देशाचे रक्षण करण्यासाठी सीमेवर जे जवान मुठीत जीव घेवून लढतात, त्यामध्ये शिख बांधवाचा मोठा सहभाग असतो. देशाच्या पातळीवर शिख समाजाने मोठा हातभार लावलेला आहे. कुठल्याही समाजाबद्दल द्वेषभावना ठेवणे चूकीचेच आहे. महाराष्ट्र व पंजाब या दोन्ही राज्याचे सलोख्याचे संबंध आहेत. तेथील शिख बांधव नांदेडला गुरुची नगरी मानतात. नांदेडचे महत्त्व कुठल्या एक-दोन राज्यापूरते मर्यादीत नसून जगाच्या पाठीवर श्रीगुरुगोविंदसिंघजी महाराज यांच्यामुळे नांदेडची वेगळी ओळख आहे. ती जपणे व सर्वांच्या मनात कायम राखणे हे आपल्या नांदेड वासियांचे आद्यकर्तव्य आहे. त्यामुळे पंजाब व महाराष्ट्रातील संबंधामध्ये कधीही कटुता निर्माण होऊनये एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना.
