चोपडा तालुक्यातील गरताड गावात
स्मशानभूमीच्या रस्त्याची दुरावस्था, चिखल मातीच्या रस्त्यातून न्यावी लागते अर्धा किमी अंत्ययात्रा…
महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी:-
चोपडा तालुक्यांतील गरताड येथील स्मशान भूमीत अनेक समस्या असून सदर समस्या लवकर सोडवाव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.स्मशान भूमी गावापासून अंदाजे अर्धा किमी (५०० मिटर) अंतरावर आहे, रस्ता काळ्यामातीतून असल्याने ग्रामपंचायत कडून खडी रेतीने डागडुजी केली जाते, तरी पण पावसाळ्यात नेहमी चिखल माती असते .

सध्या अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने सदर रस्ता चिखलाने माखला आहे.प्रेत यात्रेला यामुळे खुपच अडचणीचे होते. सदर स्मशान भूमीचा रस्ता काँक्रीटीकरण पाचशे मिटर लांब व दहा फूट रुंदीचे होणे आवश्यक आहे, तसेच पडक्या अवस्थेत असलेल्या अंत्यविधी शेड नव्याने बांधकाम करणे आवश्यक आहे .
व बैठक व्यवस्था बांधकाम, गावापासून स्मशान भूमी पाचशे मिटर लांब असल्याने इलेक्ट्रिक पोल, लाईट व्यवस्था होणे खुपच आवश्यक आहे कारण रात्री अप रात्री या बाबत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो .दि. २१ रोजी राजेश नामदेव पाटील विभागीय सरसंघप्रमुख यांच्या आईच्या अंत्यविधी वेळी सदर रस्त्यावरून चालणे अवघड झाले होते.

यासाठी शासकीय निधी मंजूर होवून प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अंतसमयी प्रेताची विटंबना होवू नये म्हणून त्वरीत निधी मंजूर होणे आवश्यक आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे.सध्या अवकाळी पावसाळ्याचे दिवस असल्याने अंत्यसंस्कार करणे तर अधिक अवघड झाले आहे. त्यामुळे संबंधितांनी लक्ष देऊन स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी शेड आणि चांगले रस्ते तयार करून द्यावे, अशी मागणी होत आहे. संपूर्ण गावसाठी एकच सार्वजनिक स्मशानभूमी असल्याने संपूर्ण गावाचे हाल होत आहेत.

स्मशानभूमी हा प्रत्येक व्यक्तीचा अंतिम थांबा असतो. त्यामुळे स्मशानभूमीशी समाजाचे भावनिक नाते आहे.यामुळे स्मशानभूमीत सुविधा आवश्यक आहेत. स्मशानभूमीत जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने रस्त्यावर सर्वत्र चिखल झाला होता. त्यातही काटेरी झुडपे वाढलेली होती. काटेरी झुडपातील चिखलमय रस्त्याने नातेवाइकांना मृतदेह स्मशानभूमीत न्यावा लागला. तसेच शेड पण पडक्या अवस्थेत असल्याने शेडची पण नव्याने बांधणी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पक्का रस्ता उपलब्ध करून द्यावा. त्यासाठी पाण्याची कायम सुविधा उपलब्ध करून द्यावी. अंत्यविधीसाठी शेड उभारावा. शिवाय स्वर्ग रथही उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत